काय आहे हंपी? याचा उत्तर खरं तर काय नाहीये हंपी, असंच मी तरी म्हणेन. अद्भुत, अवर्णनीय असं आहे हंपी. मला दिसलेलं हंपी कदाचित वेगळं असेल, थोडं चुकीचं असेल पण मला जे भावलं ते विस्ताराने मांडावं असं मनापासून वाटतंय. कारण हंपी म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासाचा कळस असावा. तसं बदामी, पट्टडक्कल ,ऐहोळी किंवा बेलूर आणि हळेबिडू हि पाहण्यासारख आहेच पण हंपी एक परिपूर्ण नगरी आहे. आणि म्हणून हा विस्तारित शब्द प्रपंच. तूर्तास फक्त हंपी बद्दल मांडतो कारण वास्तुकलेचा कळसाध्याय आहे हंपी. जणू काही सुंदर रूपवती आणि सर्व गुणसंपन्न नगरी जी गेली काही शतकं उभी आहे. भग्न झाली, गाडली गेली पण तिच्या मधलं सौन्दर्य अजूनहि तसेच आहे, किंबहुना भग्नावतेला एक वेगळीच झालर आहे म्हणा. म्हणून असेल कदाचित किंवा यवनांच्या अत्याचाराची बळी आहे म्हणून हंपी मला शापित राजकन्या वाटते. हंपी ला पुराण कथेची सुद्धा सोबत आहे, वास्तुकलेचा कळस असला तरी इतर कलांचा जागर इथे होताच हे त्या भग्न वास्तू सांगतात.
Ancient Karnataka (ऐतिहासिक कर्नाटका) हि एक वेगळीच ओळख या राज्याची देता येईल. अखंड भारताची काही अंशी उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशी विभागणी होते. कर्नाटक ओडिसा पासून साधारण दक्षिण भारत सुरु होतो असं मानलं तर हा संपूर्ण प्रदेश अशा वास्तू कलांचे एका पेक्षा एक असे नमुने आपल्या समोर सादर करतो. ह्या मध्ये द्राविडीयन, होयसळ, कदंब, चोल, चालुक्य, पल्लव अश्या राजघराण्याचे आणि त्यांच्या संस्कृतीचे दर्शन होते. या शिवाय जैन आणि बौद्ध पंथाचे कला दर्शन इथे होते. निदान कलेच्या माध्यमातून तरी सर्व राजघराणी आणि पंथ यांचे एकत्रित दर्शन होते त्यामुळे पूर्वी काही काळ तरी सर्व शांतता होती असं मानायला हरकत नाही. परंतु इतिहासात खूप मागे डोकावलं तर प्रामुख्याने शैव आणि वैष्णव वर्गात इथला समाज विभागल्याचा म्हटलं जात. पण हा झाला ज्ञात, सांगितला गेलेला इतिहास जो काही शिलालेख, पुराण कथा, ग्रंथ संपदा आणि इतर काही ज्ञात पुरावे यावरून मांडला गेलेला. पण आपण या लिखित आधुनिक इतिहासाला मागे ठेवून प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांना जेंव्हा भेट देतो किंवा ऐतिहासिक गोष्टींचं निरीक्षण करतो तेंव्हा एक गोष्ट मात्र लक्षात येते कि शैव काय वैष्णव काय हि एकाच शक्तीची रूपक आहेत असं पदोपदी समाज जीवनावर बिंबवण्याचा बराच प्रयत्न या वास्तू कलांच्या आधारे केला गेलाय. मग ती भित्तीचित्र असोत अथवा शिलालेखांवरील चिन्ह असो,किंवा कोरीव लेणी असोत. अर्थात हे माझा वैयक्तिक मत आहे. पण गेल्या ३ ते ४ वर्षात जी काही ऐतिहासिक स्थळ पहिली आणि या आधी अनावधानाने जी काही पहात आलो त्याच्या शाबूत असलेल्या आठवणींवरून आलेला माझा हा निष्कर्ष आहे. फिरण्याच्या छंदातून जे काही अनुभव येतात किंवा त्यातून जी काही मतं तयार होतात त्यापैकी एक मत असं कि काही वास्तू ह्या अद्भुत, अवार्णिनीय आणि चक्रावणाऱ्या असतात त्यापैकीच विजय नगर साम्राज्याचा मानबिंदू म्हणजे हंपी आणि वेरूळचे कैलास मंदिर हे आहेत. खरं तर कैलास मंदिर हे जगातल्या ७ आश्चर्यानं मध्ये गणलं जायला हवं होत. पण मध्य भारताच्या खालीही भारत आहे हे तेंव्हा उमगलं नसावं.
हंपी मला अद्भुत वाटलं ते कुठल्या डॉक्युमेंटरी किंवा चित्रपटाचा प्रभाव म्हणून नाही, किंवा मला इतिहासातलं किंवा वास्तुकले मधलं खूप काही कळत म्हणून नाही तर ह्या सगळ्याचा गंध नसतानाही हंपी भारावून टाकत म्हणून. खरं तर हंपी खूप वेगळ आहे म्हणून असेल पण वेड लागत कारागिरांची कारागिरी बघताना. या हि पेक्षा बदामी आणि पट्टडक्कल जास्ती वेड लावणार आहे. पण तूर्तास त्यांची व्याप्ती खूप कमी आहे. हंपीच तसं नाही मुदलात हे राजधानीच शहर त्यामुळे भव्य बाजार पेठा आणि मंदिर , त्यांची व्याप्ती आणि आजूबाजूचा परिसर ,राजाचा आणि राण्यांचा महाल, परदेशी पाहुण्यांचे अगत्य राखण्यासाठी वेगळी बैठक म्हणा किंवा गुप्त गुजगोष्टींसाठीचा विशेष कक्ष म्हणा सगळंच कलेच्या अभिषेकात न्हाऊन निघालं आहे. म्हणूनच अद्भुत आहे अवर्णनीय आहे पण तरीही बदामी आणि पट्टडकल जास्ती आकर्षक वाटतात कारण त्या शतकोत्तर बदलाची साक्ष देतात. हंपी काय किंवा बदामी काय किंवा कुठलंही ऐतिहासिक स्थळ (Archilological site) ह्या तशा भग्नावशेषच असतात खर तर कारण त्या कित्येक शतकांच्या साक्षीदार असतात आणि बर्याच वेळेला त्या संघर्षाच्याही बळी असतात. हंपी हे त्याचच उदाहरण किंबहुना महाराष्ट्रातील किल्ले बघणार्याला अधिक जवळच वाटेल असं आहे हंपी. कारण यवनांच्या विरोधात जसे किल्ले लढले पण पडले नाहीत. सरदार बदलले पण किल्ल्यानी पाठ सोडली नाही. पुढे इंग्रजांनी ते उध्वस्त केले. हंपी च पण तसंच आहे. हंपी ला साधारण २ शतकांचा इतिहास आहे आणि असं म्हटलं जात कि मध्य युगीन भारतामधल हे एक अत्यंत श्रीमंत असं शहर होत. पण पुढे मुसलमानी सुलतानांच्या आक्रमणा पुढे हंपी(विजयनगर) पडलं ते कधी न उभ राहण्यासाठी आणि सुलतानांच काय त्यांनी पण हंपी लुटलं, नागवलं पार गाढवाचा नांगर फिरवला. पण कलेचं काय ? ती त्यांना लुटता आली नाही म्हणून नासवली आणि हेच दुर्भाग्य आहे त्या हंपी च जस आपल्या किल्ल्यांचं तसंच हंपी चं म्हणून कदाचित ते अधिक जवळचे वाटतात. या सर्व ऐतिहासिक स्थळांचं अजून १ साम्य आहे इथे जसे हिंदू देव देवतांचे जसे अस्तित्व आढळते तसे जैन, बौद्ध आणि इस्लामिक स्थापत्याचे दर्शनही होते पण धर्मांध लोकांना कलेत सुद्धा धर्म दिसतो त्यामुळे इस्लामिक पद्धतीचे पुरातन वास्तू तश्या टिकून आहेत पण हिंदू मुर्त्या किंवा हिंदू सांस्कृतिक पुराणातले संदर्भ देणारे दाखले मात्र उध्वस्त करायचा प्रयत्न केला गेल्याचे दिसते. वास्तविक पूर्ण हंपी जे आत्ता टिकून आहे किंवा उत्खानानामध्ये जे काही सापडले आहे ते त्यावेळच्या वैभवतेचे दर्शन घडवतेच पण त्याहून अधिक जे काळाच्या पडद्या आड गेले त्या न झालेल्या दर्शनाचे दुःख अधिक देते. हंपी फक्त कलेचं किंवा वैभवतेच प्रतीक नाही तर उत्तम बांधकाम शास्त्राचा अभ्यास असलेल्यांचा सुद्धा प्रतीक आहे असं मला वाटतं. बांधकाम शास्त्र म्हणजे केवळ ठोकळे नसून त्यात रसिकता असायला हवी किंबहुना बांधकाम शास्त्राला रसिकतेची जोड नसेल तर व्यर्थ आहे असं त्यावेळी मानलं जात असावं असच वाटतं. पण हंपी हा कलेचा कळसाध्याय आहे तर बदामी, पट्टडक्कल , ऐहोळी हे तत्कालीन कलेच्या उत्क्रांतीचे आणि कलेत शतकोत्तर झालेल्या बदलाचे साक्षीदार आहेत. गरज हि जर उत्क्रांतीची जननी असेल तर रसिकता आणि कला ह्या समाजाच्या एकत्रीकरणाच्या जननी आहेत हे मात्र नक्की. विविध धर्म पंथ कलेच्या माध्यमातूनच एकत्र नांदू शकतात पण त्यासाठी कलाकाराला निःपक्षपाती रसिकांची गरज असते. यातील एका घटकाने जरी आपली पायरी सोडली तरी कलेचा आणि पर्यायाने समाज व्यवस्थेचा ह्रास अटळ आहे.
हंपी चा ज्ञात इतिहास ७ व्या शतका पासून सुरु होतो पण आत्ता जे हंपी दिसतं किंवा आपण बघतो किंवा जे उत्खनना मध्ये सापडलेलं हंपी आहे ते बहुतांशी १४व्या आणि १५व्या शतकात झालेल्या वैभव संपन्न बदलाचा भाग आहे. इथे सगळ्यात जुनं विरुपाक्ष मंदिर आहे जे चालुक्य आणि होयसळ राज्य कर्त्यांच्या कलाकृतीचे सुद्धा संदर्भ देत. पण तिथले जाणकार इथे त्याही आधी मानवी वस्तीचा वावर असावा असं मानतात. या संपूर्ण परिसराला एकूणच मंदिरांच शहर असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या मंदिरांमध्ये देव आहेच असं नाही आणि असला तरी तो बिचारा हि भग्नावषेशात आहे. ज्या काही मंदिरांमध्ये अजूनही धार्मिक विधिवत पूजा होते किंवा जिथला मूर्तिरूप देव शाबूत आहेत त्यापैकी जुनं आणि भव्य असं हे शंकराचं मंदिर. ५० मीटर उंच गोपुर जो आजही दक्षिण भारतात दुसऱ्या क्रमांकाचा उंच गोपुर आहे (गोपुर म्हणजे प्रवेश द्वारावरील १ उंच मनोरा). हा गोपुर नुसताच उंच नसून पूर्ण पणे आखीव रेखीव आणि अत्यंत मोहक अशा कलाकुसरीने नटलेला आहे. मंदिराच्या एका बाजूने तुंगभद्रा नदी वाहते तर बाहेरील परिसरात ३ बाजूने डोंगर रांग आहे आणि हेच भौगोलिक वैशिष्ठ्य ओळखून विजयनगर सामराज्याच्या राजधानी साठी हे स्थान निवडण्यात आले. कारण राजधानीला नैसर्गिक कवच असणं किती फायद्याचा असतं हे आपण रायगडाच्या अनुषंगाने जाणतो. विरुपाक्ष मंदिरा मध्ये अजूनही पूजा होते पण त्याही पेक्षा इथे जाऊन जर काही भाव मनात येत असेल तर तो फक्त आणि फक्त त्या कलेच्या हातांपुढे नतमस्तक होण्याचा. मंदिरात देव आहे पण त्याहीपेक्षा मला त्या मंदिराच्या निर्माण आणि नंतरच्या बदलासाठी झटलेल्या सर्व कारागिरांचा कौतुक वाटतं (संपूर्ण हंपी मध्ये हाच भाव मनात येतो) आणि नकळत त्यांना च हात जोडले जातात. मंदिरातली छोटी छोटी जागा हि नक्षीदार आहे आखीव रेखीव आहे. म्हणजे अगदी कुठल्याही वास्तूच्या पायथ्या पासून ते त्याच्या कळसा पर्यंत नक्षी कामाने नटलेली आहे. त्यामुळे गाभाऱ्यातल्या महादेवापेक्षा कलेचा जागर करणाऱ्या त्या कलाकारांना च हात जोडले गेले तर त्यात नवल नाही. अर्थात इथे कुठेही जा साज शृंगार केल्यासारखाच वाटतं मग ती मंदिर असोत किंवा राजवाडे इतकाच काय तर पाणी साठवण्याच्या जागा सुद्धा कोरिवतेने नटलेल्या आहेत. राणीचा उन्हाळा सुसह्य करणारा लोटस महाल म्हणजे नैसर्गिक रित्या तेंव्हा केलेला ऐरकण्डिशनर.
देवळा देवळा मध्ये सुद्धा विविधता आहे विरुपाक्ष शिवालय आहे तर थोड्या अंतरावर विठ्ठल मंदिर आहे. पण इथला विठ्ठल पंढरपुरात विराजमान आहे.
“ हाच तो कानडा राजा पंढरीचा” इथला. यवनांच्या आक्रमण पासून वाचवून ज्याला पंढरपुरात पुनर्स्थापित करण्यात आला. कृष्ण मंदिर आहे, मोठा गणेश, जैन मंदिर, जमिनीखालील शिवमंदिर आहे पण बऱ्यापैकी कलाकृती टिकलेल मंदिर म्हणेज हजारा राम मंदिर. इथल्या मंदिराच्या भिंतीवरती रामायणाच्या पायसदाना पासून ते हनुमानाच्या मोती खंडन करण्या पर्यंत सगळं कोरलेला आहे. आणि अशी हजार छोटीछोटी कोरीव घटनांची आखणी यात समाविष्ट आहेत म्हणून याला हजारा राम मंदिर म्हणतात. या शिवाय इथे मशीद आहे जिथे पण कला कुसर दिसते ती त्या त्या पंथाच्या पद्धतीची साक्ष देते. या संपूर्ण कलाकुसरीत विष्णूचे दशावतार दिसतात तर कुठे नंदीवर विराज मान शंकर पार्वती दिसतात, कृष्ण दिसतो, रामायण दिसत, वेग वेगळे प्राणी दिसतात. एकाच कलाकृती मध्ये दोन प्राण्यांचा छुप्या पद्धतीने समावेश केलेला दिसतो. युद्ध करणारे सैनिक आहेत, साज शृंगार करणाऱ्या स्त्रिया आहेत, वेग वेगळे दागिने आहेत. राजाशी मसलत करणार प्रधान मंडळ आहे. जाळीदार खिडक्या आहेत. कुठे थोडं भित्तीचित्र टिकल आहे ज्यात नैसर्गिक रंग भरलेले आहेत. देवळाच्या सुरवातीला साष्टांग नमस्कार घालणारे गावकरी कोरलेत. एवढंच नाही तर इथे तत्कालीन समाज जीवन दाखवलं आहे. ज्या काही असंख्य मुर्त्यांची कोरीव काम आहेत त्यात विविध अलंकार दिसतात, विविध केश भूशा दिसतात, विविध पेहराव दिसतात, छोटं छोटं नक्षी काम तर असंख्य आहे ज्याचा मनमुराद आनंद तिथे गेल्याशिवाय घेताच येत नाही. कितीही फोटो किंवा कितीही लिखाण केलं तरी त्यांचा वर्णन होऊच शकत नाही म्हणून अवर्णनीय वाटत हंपी.. कारण डोळ्याचा पारणं फिटवणारा भाव तिथे जाऊनच अनुभवावा लागतो.
देवळा देवळा मध्ये सुद्धा विविधता आहे विरुपाक्ष शिवालय आहे तर थोड्या अंतरावर विठ्ठल मंदिर आहे. पण इथला विठ्ठल पंढरपुरात विराजमान आहे.
“ हाच तो कानडा राजा पंढरीचा” इथला. यवनांच्या आक्रमण पासून वाचवून ज्याला पंढरपुरात पुनर्स्थापित करण्यात आला. कृष्ण मंदिर आहे, मोठा गणेश, जैन मंदिर, जमिनीखालील शिवमंदिर आहे पण बऱ्यापैकी कलाकृती टिकलेल मंदिर म्हणेज हजारा राम मंदिर. इथल्या मंदिराच्या भिंतीवरती रामायणाच्या पायसदाना पासून ते हनुमानाच्या मोती खंडन करण्या पर्यंत सगळं कोरलेला आहे. आणि अशी हजार छोटीछोटी कोरीव घटनांची आखणी यात समाविष्ट आहेत म्हणून याला हजारा राम मंदिर म्हणतात. या शिवाय इथे मशीद आहे जिथे पण कला कुसर दिसते ती त्या त्या पंथाच्या पद्धतीची साक्ष देते. या संपूर्ण कलाकुसरीत विष्णूचे दशावतार दिसतात तर कुठे नंदीवर विराज मान शंकर पार्वती दिसतात, कृष्ण दिसतो, रामायण दिसत, वेग वेगळे प्राणी दिसतात. एकाच कलाकृती मध्ये दोन प्राण्यांचा छुप्या पद्धतीने समावेश केलेला दिसतो. युद्ध करणारे सैनिक आहेत, साज शृंगार करणाऱ्या स्त्रिया आहेत, वेग वेगळे दागिने आहेत. राजाशी मसलत करणार प्रधान मंडळ आहे. जाळीदार खिडक्या आहेत. कुठे थोडं भित्तीचित्र टिकल आहे ज्यात नैसर्गिक रंग भरलेले आहेत. देवळाच्या सुरवातीला साष्टांग नमस्कार घालणारे गावकरी कोरलेत. एवढंच नाही तर इथे तत्कालीन समाज जीवन दाखवलं आहे. ज्या काही असंख्य मुर्त्यांची कोरीव काम आहेत त्यात विविध अलंकार दिसतात, विविध केश भूशा दिसतात, विविध पेहराव दिसतात, छोटं छोटं नक्षी काम तर असंख्य आहे ज्याचा मनमुराद आनंद तिथे गेल्याशिवाय घेताच येत नाही. कितीही फोटो किंवा कितीही लिखाण केलं तरी त्यांचा वर्णन होऊच शकत नाही म्हणून अवर्णनीय वाटत हंपी.. कारण डोळ्याचा पारणं फिटवणारा भाव तिथे जाऊनच अनुभवावा लागतो.
राज महाल आणि तो सगळापरिसर तर अजूनही सुब्बत्तेच दर्शन घडवतो. तिथे पूर्वी होणार दसरा मेळावा असो किंवा रंग पंचमी खेळायला असलेला राजाचा स्वतःचा असा हौद हे एका स्थिरस्थावर राज्याच दर्शन घडवतं. राजाचा ऐसपैस असा महाल आणि गुप्त वार्ताकरायच्या खोल्या ह्यांची रचनाही अद्भुत आहे. धातूचा वापर करून खांबांना पायथाशी ज्याप्रकारे अडकवण्यात आल आहे त्याच्या खुणा अजूनही त्या भव्य राजपटलावर दिसतात. राजाचा बसायचा चौथरा जितका भव्य तितकाच समोरील सभा मंडप भव्य आहे याचा जर कुठे संदर्भ द्यावयाचा असल्यास नुकताच आलेला बाहुबली चित्रपटात ( भाग २) मध्ये तसाच सेट उभा करण्यात आला आहे. विजयनगरचा साम्राज्य दक्ष होतं पण रसिक होतं आणि जेंव्हा राज्यकर्त्यांची दक्षता लोप पावते तेंव्हा राज्य लोप पावत. इथेही तसच झालं असावं कारण रसिकता असणं म्हणजे गाफिल रहाणं असं होत नसतो. आमच्या लहानपणी तेनाली रामा नावाची मालिका फार प्रसिद्ध होती ( तेनाली रामकृष्णन ), हे व्यक्तिमत्व ह्याच हंपी च्या कृष्णदेवराय राजाच्या राज्यातील एक व्यासंगी कथानक. इथे हा तेनाली रामा विकटकवी म्हणून ओळखला जातो. एकूणच स्थापत्य, वास्तू कला इथे होतीच पण इतर कलाही समृद्ध होत्या. कवी होते, वादक हि असावेत कारण तशा खुणा आहेत, संगीत आणि नृत्य या कलाही इथे जोपासल्या गेल्याच दिसतं. हंपी च्या अद्भुतते मध्ये भर घालता ते इथल विठ्ठल मंदिर. या मंदिराच्या मुख्य सभामंडपात विशिष्ट प्रकारच्या दगडाची रचना करून उभे केलेले खांब विशिष्ट प्रकारच्या ध्वनीचे प्रक्षेपण करतील अशी उपाययोजना केलेली होती. असे छप्पन खांब इथे होते आणि प्रत्येक खांब हा वेग वेगळ्या वाद्यांचा आवाज प्रक्षेपित करत असे. कुठला खांब कुठल्या वाद्याचा आवाज देईल हे ओळखण्यासाठी त्या त्या वाद्याची कोरीव अशी प्रतिमा त्या खांबावर आहे. यवनांची तर कुवत नव्हती हे ओळखण्याची म्हणून त्यांनी इथे तोड मोड तर केलीच पण जे काही खांब वाचले होते त्याची वाट आपल्यातल्या अनास्थेने आणि अतिउत्सहाने लावली. त्यामुळे आता तिथे कुठलाही प्रकारचा आवाज येत नाही. तेंव्हा हे खांब चंदनाच्या लाकडाने(चंदनाचे का हे हि कुतूहल आहेच. कदाचित पवित्र मानलं जात असावं) एका विशिष्ट कोना मध्ये वाजवले जात, पण आवाज येतो म्हणून आपल्याच लोकांनी दगड मारून वाजवून बघितलं आणि त्या रचनेला अजून हतबल केलं. पुढे युनेस्को ने तिथे जायला बंदी घातली पण तोवर जी वाट लागायची ती लागली होती. या विठ्ठल मंदिरात १ दगडी रथ आहे तो कधीच चालला नसावा पण पूर्वी त्याची चाक फिरत होती आता ती सिमेंट मध्ये फिक्स केलेली आहेत कारण तेच १कंदर पर्यटकांची अतिउत्साही पावलं. हल्ली रथ फुलाने सजवतात पण हा दगडी रथ पूर्ण कलाकुसरीने कायमचा सजवलेला आहे. फक्त राजाच असं नाही तर प्रजेचंही मनोरंजन व्हावं म्हणून खास सोयी आहेत त्याच्या भग्न खुणा दिसतात. एकूणच कलेकडे कल जास्ती दिसतो हे खरं पण म्हणून २ शतक राज्य करणं सोपं नाही म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यकर्ते स्वयंपूर्ण असणारच.
नुसतीच कला हा कुठल्या समाजजीवनाचा भाग असू शकत नाही हंपी तर राजधानी होती आणि कला जगायला जगवायला समाज जगला पाहिजे आणि समाज जगण्यासाठी अर्थचक्र फिरायला हवा म्हणून ३ भव्य मंदिरांसमोर भव्य अशा बाजार पेठा इथल्या व्यवहाराचं दर्शन घडवतात. विरुपाक्ष मंदिर, हजारा राम मंदिर, आणि कृष्ण मंदिरा समोर भव्य बाजार पेठा आहेत. यातील विरुपाक्ष मंदिरा समोरची बाजार पेठ तर आताही भव्य दिसते आणि हि फक्त म्हणे सोन्या चांदीची आणि हिरे माणकांची बाजार पेठ होती. हि बाजारपेठ आत्ताही साधारण अर्धा किलोमीटर लांब रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुमजली दुकान त्यावरही ठीकठिकाणी कोरीव काम एकूणच वैभवतेची, स्थैर्याची, संपन्नतेची आणि अर्थात रसिकतेची साक्ष देते. या ३ बाजार पेठा इथली संपंन्नता दर्शवतात पण त्याही पेक्षा इथल्या राजाला आणि राज्याला आलेला स्थिर स्थावर पणाही दर्शवतात. अन्यथा इतका मोठा व्यापार होणं शक्य नाही आणि इथल्या अर्थचक्राचा गाढा इथूनच ओढला जात असणार ह्याची च त्या साक्ष आहेत. समाज जीवन समृद्ध व्हायला ते स्थिर व्हायला नुसतंच ते नैसर्गिक रित्या संरक्षित असून चालत नाही त्या साठी दक्ष असं सैन्य बळ लागत आणि तशी व्यवस्था लागते. आजूबाजूच्या डोंगर रांगात तशा खाणा खुणा दिसतात, त्या सैनिकांना उंचावर नेमण्यासाठी देण्यात आलेला निरीक्षण कक्ष (वाट्च टॉवर), राज महालाच्या परिसरातले मनोरे आणि एकंदर हंपी ची नगर रचना त्याची अनुभूती देते. ३ बाजूनं मोठं मोठ्या दगडांची डोंगर रांग आणि १ का बाजूला तुंगभद्रा अश्या नैसर्गिक कवचावर विजयनगर रामराज्य २ शतक टिकलं वाढलं आणि समृद्ध झालं. पण नैसर्गिकतेला स्वश्रमाची आणि जागरूकतेची जोड नसेल तर जे होईल तेच विजयनगरचे पर्यायाने हंपी चे झाले यात कोणताही दुमत नाही.
स्थापत्य कलेचा अजून १ उत्तम नमुना म्हणजे इथलं पाणी व्यवस्थापन जे राजवाडा आणि नजीकच्या परिसरात अजूनही दिसत किंबहुना तिथल टिकून असावं. दगडाला रेखीव कोरून पाण्याला वाहून आणण्यासाठी तयार केलेले छोटे कालवे आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग करून केलेल्या रचनेने मला तरी अचंभित केलं. पूर्वी कधीतरी खडकवासल्याचे पाणी शनवार वाड्यावर शिकलो होतो तेंव्हाही मला असच वाटलं होतं कारण प्रत्यक्षात हे अंतर खूप आहे. इथे असलेली विहीर ज्या प्रकारे कोरून काढली आहे त्याला तर तोड नाही असं कोरीव काम विहिरी बाबतीत इतरत्रहि सापडतं पण तरीही इथे त्याचं असलेलं अस्तित्व डोळ्यात भरतं. एक शापित विशाल काय नृसिंहाची मूर्ती पण लक्ष वेधक आहे भग्नावतेचा शाप अंगीकारून ती अजूनही या सगळ्या बदलाची साक्ष आहे. असच विशालकाय शिवलिंग पण आहे त्याला तुंगभद्रा स्वतःहून जलाभिषेक करते अजूनही, तशी व्यवस्था पूर्वापार मुद्दाम केल्याचा दिसत.
या हंपी ला एक दंतकथा किंवा पुराणकथेचं हि वैशिठ्य आहे. ते असं कि या तुंगभद्रेच्या पलीकडल्या काठावर म्हणजे विरुपाक्ष मंदिराच्या उत्तरे कडे १ऊंचं पर्वत आहे आणि पौराणिक कथेच्या आधारे हा पर्वत म्हणजे रामायणातील किष्किंधा नगराचा भाग आणि हनुमानाचा जन्म इथला च म्हणून तिथे वर एक हनुमान मंदिरही आहे. दंतकथेचा भाग बाजूला ठेवला तर ती जागा खूपच सुंदर आहे. तिथे गाडी जात नाही त्यामुळे उंच अशा पायऱ्या चढत जावा लागत पण तिथे गेल्यावर संपूर्ण हंपी नजरेच्या टप्यात येते. तिथे जाताना १ चांगली दुर्बीण नेल्यास हंपी चा थोडाफार टॉप वू मिळू शकेल. विरुपाक्ष मंदिर तर दिसतच पण बाकी गोष्टी पण दिसतात. इथे आवर्जून जा असं मी तरी सांगेन थोडे कष्ट आहेत पण नक्कीच वसूल जागा आहे. मंदिरही छान आहे सो दर्शन घ्यायला हरकत नाही.
असं हे हंपी १ परिपूर्ण शहर आहे म्हटलं तर भग्न आहे म्हटलं तर पूर्ण आहे गरज फक्त आपल्या डोळ्यांना ते दिसण्याची आहे. बघायला गेला तर इतरत्र नुसतेच दगड आहेत किंवा भग्नावशेष आहेत. तुम्हाला इतिहासाशी घेणं देणं नसेल तरीही हंपी निराश नाही करत कारण इतिहास माहित असावं अशी मुदलात अटच नाही. पण तो माहित असल्यास मजा वाढेल. इथे यायचं ते कला कुसर बघायला. छोट्या छोट्या मूर्त्यापण जिवंत केल्यात कलाकाराने ते अनुभवायला. इथे यायची अट किंवा गरज एकच पहिल्यांदा येणार्याने गाईड करावा तो आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टी उलगडून दाखवतो (माझ मत आहे कारण मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाऱ्याचं काय काम असं म्हणणारा किंवा गूगल करून मेडिसिन घेणारा वर्ग वाढतो आहे त्यामुळे अशा ठिकाणी गाईड कशाला हवा हा हि विचार येऊ शकतो). साधारण पूर्ण दिवसाचे १७०० रुपये घेतो. त्यामुळे महाग किंवा स्वस्त हे ज्याने त्याने ठरवावं पण निराशा नक्की होणार नाही. १का दिवसात हंपी पूर्ण नाही होत पण महत्वाच्या गोष्टी पाहून नक्की होतात. स्वतःची गाडी असल्यास जास्ती कष्ट पडत नाहीत. हंपी पासून होस्पेट ११ कि.मी. आहे बेल्लारी ३५ कि.मी. आहे इथे ट्रेन ने जात येत तिथून हंपी जवळ आहे. असं हे अद्भुत हंपी काही शतकांची साक्ष आपल्या कवेत घेऊन रोज उजाडत आणि झोपी जात. रोज नव्याने नटून पर्यटकांच्या प्रतीक्षेत कारागिरीचा एंसायक्लोपेडिया उलगत असतं
पण या हंपी ची एक खंत आहे जी सगळ्याच ऐतिहासिक स्थळांची आहे म्हणा मग ते किल्ले असोत किंवा लेण्या किंवा पर्यटन स्थळ किंवा धार्मिक जुनी स्थळ. ती ज्योतिर्लिंग असोत किंवा अजून कुठली. हि स्थळ ओरडून ओरडून सांगत असतात कि लोकहो या आमच्या अंगा खांद्यावर खेळा पण आधीच आम्ही गांजलो आहोत तेंव्हा ओरबाडू नका. आमच्यातल्या कमकुवतपणाचं भान ठेवा आणि भानावर राहून मजा करा. इथे या पण आमचा अस्तित्व पुसेल असं काही करू नका, खडूने तुमची नवा लिहुन उगाच आम्हाला बाटवु नका आम्ही जसे आहोत तसेच सुंदर आहोत तेंव्हा पानाच्या पिचकाऱ्यांनी आम्हाला रंगवू नका. गर्दी झालीच तर थोडे माणसांसारखे वागा एरवी जनावरांसारखे वागताच पण थोडा माणूस म्हणून या आणि समृद्ध वारसा माणूस म्हणून अनुभव. थुंकताना किंवा खडूने लिहिताना विचार करा तुमच्या हात पायावर हे कराल का? कोणी बघत नसलं तरी मी हंपी सगळं बघते आहे याचा भान असुद्या. मी जशी आहे तशी रहाणं तुमच्या हातात आहे पडले झडले तरी मला न सोयर न सुतक पण आहे तोवर उभी रहाणं हे माझा कर्तव्य आहे.
तर असं आहे मला भावलेलं हंपी तुम्हाला लिहिलेला आवडलं तर चांगभलं मात्र हे वाचून कंटाळा जरी आला तरी तिथे जाऊन कंटाळा येणार नाही हे नक्की. हंपी बरोबर पट्टडक्कल, बदामी ऐहोळी आणि विजापूर असं करता येत. बदामी आणि ऐहोळी पट्टाद्दकल बद्दल जमेल तस लिहीनच तूर्तास क्रमशः
एक प्रवासमित्र